अतिवृष्टी : KDMC मधील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

कल्याण डोंबिवली : प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना शनिवार, ४ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केडीएमसी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
केडीएमसी शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांना आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, सीआयएससीई तसेच सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा-महाविद्यालयांना हा निर्णय लागू राहणार आहे.
हवामान विभागाने ३ जुलै ते ५ जुलै या कालावधीत ठाणे जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा दिला असून, ३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, ४ जुलै रोजी रेड अलर्ट आणि ५ जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, काही भागांत पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिकेने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ही सूचना महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर केडीएमसी शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




